स्वच्छता सभापती शेख निजाम यांचे सदस्यत्व रद्द करून फौजदारी कारवाई करा महेश आठवले यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
स्वच्छता सभापती शेख निजाम यांचे सदस्यत्व रद्द करून फौजदारी कारवाई करा
महेश आठवले यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
बीड।एस.एम.न्युज़ -
बीड नगर परिषदेचे नगरसेवक तथा स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्याविरुद्ध विविध गंभीर अनियमितता, शासकीय जमिनीचे गैरव्यवहार, निवडणूक प्रक्रियेत कथित चुकीची माहिती सादर करणे तसेच इतर बाबींची सखोल चौकशी करून त्यांचे सदस्यत्व रद्द करून फौजदारी कारवाई करण्यात यावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश दीपकराव आठवले यांनी केली असून मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरूच राहील असे म्हटले आहे.
राजकारण मग ते गल्लीतले, गावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले, राज्यातले किंवा देशातले कोणतेही असो त्यात काही नेतृत्व हे वादातीत असतात तर काही वादग्रस्त ठरतात. अशाच नेत्यांमध्ये बीड शहरातील मातब्बर राजकारणी म्हणून ओळखले जाणारे शेख निजाम हेही एक आहेत. ते राजकारणात कोणत्याही पदावर असो किंवा नसो सदैव वादात आणि चर्चेत राहतात. म्हणूनच ते एक वादग्रस्त राजकारणी म्हणून ओळखले जातात. राजकारणात आतापर्यंत भाजप वगळता असा एकही पक्ष नाही ज्यात ते गेले नव्हते. असे शेख निजाम हे काही महिन्यांपूर्वी झालेल्या बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि स्वच्छता सभापतीपदी विराजमान ही झाले. जेव्हापासून त्यांनी हे पद स्वीकारले तेव्हापासून ते सदैव वादग्रस्त ठरू लागले आहेत. यात त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता, राजकीय पक्ष बदल आणि महामानव संविधान रचयिते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बीड शहराच्या अनेक भागातील रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये खडी टाकल्याने शहरवासीयांना होणारा त्रास व संध्याकाळी बशीरगंज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रस्त्यावर आलेले नालीतील गलिच्छ पाणी आणि त्यातून जयंती साजरी करणाऱ्या भीम बंधू-भगिनींना झालेला मनस्ताप, यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द व्हावे आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने लावून धरलेली आहे. परंतु शासन आणि प्रशासनाकडून अजून पर्यंत यावर कुठलीच कारवाई करण्यात न आल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश दीपकराव आठवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यामुळे आता या आंदोलनाची दखल घेऊन शासन-प्रशासन काय कारवाई करतात? याकडे बीड शहरासह संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे.
चौकट -
शेख निजाम यांच्याविरुद्ध निवेदनात नमूद केलेले आरोप -
शेख निजाम यांनी आतापर्यंत केलेल्या सर्व खरेदी-विक्री व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्यांनी वडिलांसह भावांच्या नावे अनेक शासकीय तसेच गायरान जमिनी बेकायदेशीररित्या हस्तगत केल्याचा आरोप. बार्शी नाका पुलाजवळील नदी परिसरात जमीन बेकायदेशीररित्या स्वतःच्या नावावर करून त्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू केल्याचा आरोप. बालेपीर येथील धार्मिक संस्थानाची जमीन स्वतःच्या नावे करून तिचा वैयक्तिक वापर केल्याचा आरोप. पेठ बीड भागातील जमीन हैदराबाद संस्थानाने त्यांच्या वडिलांना भेट दिली असल्याचे बोगस प्रमाणपत्र दाखल करून जमीन हस्तगत केल्याचा आरोप. केसोना हॉस्पिटल समोर कोणतीही वैध परवानगी न घेता चार मजली इमारत बांधल्याचा आरोप. निवडणूक अर्जात खोटी माहिती सादर केल्याचा आरोप. नगरपरिषदेच्या गाड्याचे भाडे थकीत ठेवल्याचा आरोप. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नावावरील जमीनी बळकावल्या असे आरोप करण्यात आले असून या सर्व बाबी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असल्याने निष्पक्ष व सखोल चौकशी करून निजाम यांचे नगरसेवक सदस्यत्व रद्द करण्यात यावे आणि ते यात दोषी आढळल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशाराही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या युवक आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष महेश दीपकराव आठवले यांनी दिला आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा